एकाच रात्री दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून दुचाकीस्वार फरार; नवीन नाशिक मध्येभीतीचे वातावरण
Maharashtra 24 NewsMay 12, 2026
0
नवीन नाशिकात मध्ये ‘ चैन स्नॅचर्स’चा हैदोस
एकाच रात्री दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून दुचाकीस्वार फरार; नवीन नाशिक मध्येभीतीचे वातावरण
सिडको :-
Nashik craim:- नाशिक शहरात पुन्हा एकदा साखळीचोरांनी डोके वर काढले असून अंबड पोलीस ठाणे हद्दीत एकाच रात्री दोन ठिकाणी घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांनी महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भररस्त्यात दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी क्षणार्धात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पोबारा केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
पहिली घटना कर्मयोगी नगर परिसरात रात्री दहा ते सव्वा दहाच्या सुमारास घडली. संबंधित महिला आपल्या मुलीसोबत रात्री जेवण झाल्यानंतर परिसरात शतपावली करत होत्या. परिसर शांत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी अचानक त्यांच्याजवळ येत त्यांच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावली. घटना इतक्या वेगाने घडली की जाधव यांना काही समजण्याच्या आतच चोरटे अंधाराचा फायदा घेत फरार झाले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, दुसरी घटना त्रिमूर्ती चौक परिसरात घडली. तर दुसरीमाहिला कार्यक्रमानिमित्त त्यांच्या मैत्रिणीकडे गेल्या होत्या. त्या परिसरातून जात असताना मागून केटीएम स्पोर्ट्स बाईकवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ८ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी जबरदस्तीने खेचून नेली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे त्या घाबरून गेल्या. चोरट्यांनी काही क्षणांतच वेगाने पलायन केले.
दोन्ही घटनांमध्ये मिळून सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचे सोने चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे दोन्ही घटना रात्रीच्या वेळी आणि एकाच परिसरात घडल्याने शहरात सक्रिय असलेल्या साखळीचोरांच्या टोळीबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
घटनांची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून संशयित दुचाकीस्वारांचा शोध सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहावे, मौल्यवान दागिने उघडपणे न घालण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
एकाच रात्री दोन महिलांना लक्ष्य केल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.